Thursday, 12 February 2026

पोलीस_प्रशासनाची_लोकशाहीत_हुकूमशाही ?


 #पोलीस_प्रशासनाची_लोकशाहीत_हुकूमशाही ?

"आज पत्रकार अशोक उद्या त्या जागी तुम्ही असाल..!

व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको..





अडीच महिन्यापूर्वी एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी फूस लावून पळून नेली. यासंदर्भात नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित कुटुंबातील आई-वडिलांनी तक्रार दाखल केली. आरोपीचे नाव सांगितले. मात्र या प्रकरणात अद्याप पर्यंत अल्पवयीन मुलीचा शोधही लागला नाही. वारंवार पोलिसाकडे चकरा मारून पीडित कुटुंब थकले. दहा तारखेला रात्री हे पीडित कुटुंब पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये चौकशी करण्यासाठी आले असता. पोलिसांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी केला. नातेवाईकांनी फोन केला म्हणून पत्रकार अशोक काळकुटे पोलीस स्टेशनला पोहोचले. त्यावेळी फक्त काय झालं असं विचारपूस करताना संबंधित पीडित कुटुंबातील नातेवाईकांनी आम्हाला मारहाण झाल्याचे सांगितलं. असे विचारपूस करत असतानाच नेकनूर मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांनी अशोक काळकुटे यांना पूर्वग्रह दूषितपणा पोलीस स्टेशनच्या इमारती बाहेर काढले. नेमकं काय झाले. हे पत्रकारांनी विचारले ही चूक झाली का? पीडित कुटुंबाची बाजू ऐकून घेतली हे चूक? यावेळी कुठलीच बाजू ऐकून घ्यायला पोलीस तयार नव्हते. यासंदर्भातील बातमी अशोक काळकुटे यांनी त्यांच्या वाहिनीवर चालवली.. पोलिसांची बाजू आणि बाईट द्या अशी मागणी सुद्धा अशोक काळकुटे यांनी ठाणे प्रमुख यांच्याकडे केली होती. पण यापूर्वी केलेल्या बातमीचा राग मनात धरून अशोक काळकुटे यांच्या विरोधात एन सी (गुन्हा दाखल)केला आहे. 


हद्द म्हणजे जे पीडित कुटुंब सतरा वर्षाची लेक शोधून द्या या मागणीसाठी आले होते. त्या कुटुंबावर पण पोलीस स्टेशनच्या आवारात गोंधळ घातला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक काळकुटे यांनी पीडित कुटुंबाची विचारपूस केली म्हणून शासकीय कामात अडथळा आणला, आरोपाची बातमी केली म्हणून बदनामी केली असा तक्रारीत उल्लेख आहे. 


पीडित कुटुंबाचा आवाज, त्यांच्या न्यायाची बाजू घेणं आणि व्यवस्थेला प्रश्न विचारानं हा जर गुन्हे असेल तर तो अशोक काळकुटे यांनी केला. याची शिक्षा भोगायला तयार आहोत. मात्र शेतकरी अडाणी कुटुंबात लेक बेपत्ता झाली याच छातीवर दुःख घेऊन पोलिसांकडे न्यायाची अपेक्षा घेऊन पोलिस स्टेशनची पायरी चढने ही त्या आई वडिलांची चूक होती? आमच्या मुलीला शोधून द्या..अस म्हणणं चूक होती. पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. ही चूक म्हणून शिक्षा देण्यासाठी पोलिस स्टेशन मध्ये गोंधळ घातला म्हणून नेकनुर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.. अशी कित्येक उदाहरण आहेत. पोलिस स्टेशन मध्ये येऊन पोलिसांना धमक्या देणारे, तोड फोड करणारे यांना कशाला नादी लागायचं म्हणून सोडून दिले जाते. मात्र पोटचा गोळा अडीच महिन्यापासून बेपत्ता आहे. ती जिवंत आहे.की कोणत्या परिस्थित यांच्या काळजीपोटी विचारलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. ही कुठली पद्धत आहे.


संवेदना मेलेल्या नोकरशाहिची हुकूमशाही कडे वाटचाल असले तर हे अत्यंत धक्कादायक आहे. सामान्य माणसाला गुन्हा, कोर्टाची पायरी म्हटलं की अंगावर काटा येतो. याचाच गैर फायदा घेऊन कायद्याची भीती दाखवून अनेकांच्या खिशावर डल्ला मारणारे अशी प्रतिमा असलेल्या पोलीस दलात सर्वच जण तसे असतात अस नाही पण अनेकांना आलेला अनुभव देखील असाच आहे. 


आज पत्रकारितेमध्ये अनेक नवोदित पत्रकार येत आहेत. पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन देखील बदललेला आहे. पाकीट पत्रकारिता असा आरोप होतो. असे काही धंदेवाईक नाहीत अस मी मुळीच म्हणणार नाही. पण खरी काय खोटी काय या दोन्ही बाजू बातमीत असाव्यात एवढी मूल्य जपून तटस्थ पद्धतीने माध्यम म्हणून बातमीदारी केली जाते. अशी खरी पत्रकारिता केली बातम्या केल्या की अनेक हित शत्रू होतात. मग धमकी बदनामी गुन्हा गुन्हे दाखल करणे. हे मार्ग अवलंबणे या पैकीच अशोक वर झालेला गुन्हा एक भाग असू शकतो.


आता तर "डर का काला धंदा " हे भिंग फुटु नये म्हणून चक्क लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेवर, पत्रकारावर पुन्हा दाखल करून मुस्कटदाबी होत असेल तर या विरोधात सर्व पत्रकार एकत्रित येऊन लढा नक्की उभारावा लागेल. आज अशोक आहे उद्या त्या जागेवर दुसरा असू शकतो. सोईची भूमिका घेण्यासाठी असा दबाव टाकला जाऊ शकतो. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे चालत नाहीत.वेळीच विचार करून या मानसिकतेला विरोध होणे आवश्यक आहे. अशोक काळकुटे यांच्या न्यायिक लढ्यात आम्ही सर्वजण सोबत आहोत.


#BEED #beedcrime #पोलीस_अधीक्षक #निषेध #पत्रकारिता ,#बातमीदारी #अशोककाळाकुटे

No comments:

Post a Comment